शिंदे-फडणवीसांच्या निर्णयावर राज ठाकरेंचा संताप; सरकारविरोधात पहिला मोठा हल्ला



मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरे यांना आव्हान देत महाविकास आघाडीतून बाहेर पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही राज यांनी भेट घेतली. तसंच भाजपचेही विविध नेते राज ठाकरेंना भेटले होते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने असल्याची चर्चा रंगत असतानाच आज मात्र त्यांनी सरकारच्या एका निर्णयाचा खरपूस समाचार घेतला आहे.

महाराष्ट्रातील आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये नगराध्यक्षपदाची निवड थेट जनतेतून करण्याच्या निर्णयाला काही दिवसांपूर्वी मंजुरी देण्यात आली आहे. तसंच ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवड देखील जनतेतून करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयावर राज ठाकरे यांनी नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली.

उद्धव ठाकरेंचं सरकार चांगलं सुरू होतं, त्यांच्यासोबत युती करू; कार्यकर्त्याच्या विनंतीवर राज ठाकरेंचा खुलासा

'निवडणुकीची आजपर्यंत जी पद्धत सुरू होती, तीच सुरू राहिली पाहिजे. ज्याचं बहुमत त्याचाच सरपंच बसला पाहिजे. ज्याचे नगरसेवक जास्त त्याचा नगराध्यक्ष आणि महापौर बसला पाहिजे. त्यातून तुम्ही कोणाला तरी जबाबदार धरू शकता. नव्या सिस्टममुळे आपण कोणाला जबाबदार धरायचा, असा प्रश्न जनतेसमोर निर्माण होतो. सरकार बदललं की ते लगेच ठरवतात निवडणुका कशा घ्यायच्या, मग निवडणूक आयोग नक्की काय करत आहे?' असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी केलेल्या या टीकेला सरकारच्या बाजूने कसं उत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.