पत्नी आपल्या पतीला कोणत्या गोष्टी सांगू शकत नाही वाचा सविस्तर

 



विवाह हा माणसाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा असतो. त्यानंतर माणसाला आयुष्यभरासाठीचा साथीदार मिळतो, हे तर आहेच. पण विवाहानंतर त्याच्या आयुष्यात अनेक बदल होतात, हेही खरं आहे. विवाहाआधी माणूस एकटा असला, तरी स्वतंत्र असतो. आपल्याला आवडेल ते करण्यासाठी मोकळा असतो. विवाहानंतर तो प्रेमबंधनात अडकतो. नवरा-बायको एकमेकांना समजून घेणारे आणि एकमेकांचं व्यक्तिस्वातंत्र्य जपू देणारे असले, तर अशा नात्यातल्या बंधनाची अडचण होत नाही. व्यक्तिस्वातंत्र्य जपता येत नसेल, तर मात्र असे नातेसंबंध प्रेमाचे असले, तरी घुसमटवणारे ठरतात. पती-पत्नीचं (Husband-Wife) नातं परस्परांवरच्या विश्वासातून फुलतं आणि दृढ होतं.


प्रत्येक गोष्ट एकमेकांशी शेअर केलीच पाहिजे असं बंधन घालून घेण्यापेक्षा दोघांचा एकमेकांवर नितांत विश्वास असेल, तर त्या नात्याला तडा जात नाही. लग्नानंतर पती-पत्नी सहसा सगळ्या गोष्टी एकमेकांशी शेअर करतात. तरीही अशा काही गोष्टी असतात, की पत्नी आपल्या पतीला कधीच सांगत नाही किंवा त्या गोष्टी तिला सहजपणे पतीला सांगता येणं शक्य नसतं. अशा कोणत्या गोष्टी असू शकतात, याबद्दल काही विवाहित स्त्रियांना (Married Women) काय वाटतं, ते पाहू या. 'टाइम्स ऑफ इंडिया' ने याबद्दल चर्चा करणारा लेख प्रसिद्ध केला आहे.

एका स्त्रीच्या विवाहाला तीन महिने झाले आहेत. कोणीही परफेक्ट (Perfect) नसतं, याची तिला कल्पना आहे. ती तिच्या पतीवर प्रेम करते आणि त्याचा पूर्ण आदर करते. तरीही अनेक गोष्टींवरून ती नकळत तिच्या अगोदरच्या बॉयफ्रेंडशी (Ex-Boyfriend) पतीची तुलना करते. हे वैवाहिक आयुष्यासाठी (Married Life) चांगलं नाही, याचीही तिला जाणीव आहे. म्हणूनच बॉयफ्रेंडला विसरण्याचा प्रयत्न ती करतेय. पतीशी कितीही चांगलं नातं असलं, तरी ही गोष्ट पतीशी शेअर करणं शक्य नाही.


दुसऱ्या एका स्त्रीचा या बाबतीतला अनुभव असा आहे, की तिचा पतीच तिला लग्नापूर्वीच्या रिलेशनशिप्सबद्दल (Past Relationships) विचारतो. ती सहजपणे त्या विषयाला बगल देते आणि उत्तर देणं टाळते. ती म्हणते, की 'आमच्या लग्नाला आता तीन वर्षं होऊन गेली आहेत. मी आता पूर्णपणे पतीवरच प्रेम करणारी पत्नी आहे. माझ्या जुन्या रिलेशनशिप्स हा विषय आता इतिहासजमा झाला आहे. त्याचा माझ्या वर्तमानकाळावर काहीही परिणाम होऊ नये, असं मला वाटतं. कारण मी त्या गोष्टी मागे टाकून पुढे आले आहे. म्हणूनच मी त्याबद्दल पतीला काही सांगू इच्छित नाही. कारण त्याच्या मनात असुरक्षिततेची भावना तयार होण्यास ते कारणीभूत ठरू शकतं.'


Source -  lokmat