Vodafone-Idea ग्राहकांनो लक्ष द्या



दक्षिण महाराष्ट्रासह मुंबई-पुण्यात गेल्या 24 तासांत मुसळधार पावसानं धुमशान घातलं आहे. यामुळे राज्यातल्या काही भागांत पुरस्थिती निर्माण झाली आहे. यातच आता देशाला मोबाईल सेवा देणाऱ्या व्होडाफोन-आयडियाचे (Vodafone-Idea ) मोबाईल नेटवर्क गायब झालं आहे. याबाबत वोडाफोननं माहिती दिली आहे. पुण्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ग्राहकांना कनेक्टिव्हिटी फेल्युअरचा त्रास होत आहे.

पुण्यात बुधवारी रात्रीपासून व्होडाफोनचे नेटवर्क नाही आहे. तर मुंबईत देखील काही ठिकाणी नेटवर्क डाउन झाले आहे. याबाबत सोशल मीडियावर ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. ग्राहकांनी सोशल मीडियावर नेटवर्क नसल्याची तक्रार केल्यानंतर कंपनीकडून याबाबत खुलासा करण्यात आला आहे.

एकीकडे नेटवर्क नसल्यामुळे ग्राहक सेवा केंद्राशीही संपर्क साधणे कठिण झाले होते. या नेटवर्कबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत ग्राहकांनी हे नेटवर्क सोडण्याचे आवाहनही इतरांना केले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर लोकांनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल केल्यानंतर वोडाफोन आयडियाने नेटवर्क इश्यू झाल्याचे मान्य केले आहे. तसेच, त्यावर काम सुरू असून पुन्हा नेटवर्क पूर्ववत होण्यासाठी पाच ते 6 तासांचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.