जर पाळी त्याला येत असती..

 

जर पाळी त्याला येत असती.. 

तर मी मुक्त झाले असते...

माझी वर्जिनिटी हा माझ्या मर्जीचा विषय झाला असता. 

जर पाळी त्याला आली असती तर, संभोगाकडे हात वळवताना त्याने आधी समाजाचा विचार केला असता. 


पाळी त्याला आली असती, 

तर माझ्या शब्दांना मान आला असता. 

समाजाच्या नजरेत मी स्वतंत्र वावरले असते. 


पाळी त्याला आली असती तर अंग आणि इज्जत त्याने झाकली असती. तेव्हा एखाद्या घरात म्हटलं असतं, वंशाला दिवा नको घराण्याला पणती हवी आम्हाला.


जर पाळी त्याला आली असती तर घरात त्याने संसर्ग का होईना पण दमट मोरीत लपवून पाळीचे कपडे वाळत घातले असते.


पाळी त्याला आली असती तर दर महिन्याला त्याला खूप त्रास झाला असता, मग लपवून काळया पिशवीत मटणा ऐवजी सॅनिटरी नॅपकिन गेला असता. 


पाळी त्याला आली असती तर एखाद्या महिन्यात पाळी मिस होताना त्याने मनात कित्येक शंकांना आमंत्रण दिले असते.


जर पाळी त्याला आली असती तर त्याचा जन्म फक्त जन्म देण्यापुरता महत्त्वाचा मानला गेला असता.

जर पाळी त्याला आली असती तर राम तीर्थंकरला त्याने इंदुरीकर बनून विरोध केला असता.

जर पाळी त्याला आली असती तर वेदनांमुळे भावूक होण्याचं प्रमाण त्याचं जास्त वाढलं असतं.

 

जर पाळी त्याला आली असती तर छाती आणि योनीला टक लावून पाहणारे डोळे छातीचा आणि गर्भाशयाचा कर्करोग ऐकुन स्त्रीत्वाला जपू लागले असते. 


जर पाळी त्याला आली असती तर नऊ महिने जीवाला उदरात वाढवताना तो सुद्धा हळवा आणि मायाळू झाला असता. बलात्काराचं रूप प्रसुतीची नाळ कापताना तुटून पडलं असतं. 


जर पाळी त्याला आली असती तर बाईवर उगारणारा हात तिला जपण्यासाठी खांद्यावर गेला असता, मी म्हटलं ना जन्म जर त्याच्या उदरातून झाला असता तर तोही स्त्रीबाबत अहिंसावादी झाला असता. 


पाळी त्याला आली असती तर पाळीच्या लाल रक्तापासून रजोनिवृत्ती पर्यंतचा काळ त्याला पान्हा फोडून गेला असता. त्याचं बाईपण संपण्याचा प्रवास ठरवणाऱ्या समाजाला त्याने संतापाने चिरडले असते. 


पण जर पौगंडावस्थेपर्यंत पाळी नसती आली तर बंद खोलीत चिंतेचं वातावरण वाढत गेलं असतं. आई, मावशी, ताईकडून स्त्रीत्वावर बोट असतं उगारले. 


जर पाळी त्याला आली असती तर मला ऐकायला लागले असते, जोपर्यंत तू पुरुष होत नाही तोपर्यंत तुला कळणार नाही. 


जर पाळी त्याला आलीच नसती तर तोही समाजात वांझ, पांढऱ्या पायाचा, अपशकुनी म्हणून जगला असता. 

तो जगला असता?

जर पाळी त्याला आलीच नसती तर त्याला जन्मभर स्वतःच्या जन्मावर शंका घ्यावी लागली असती. 

त्यामुळे कदाचित पाळीचं वरदान त्याला मिळालं असतं तर,

स्त्री पुरुष आदराच्या व्याख्या त्याने आळवल्या असत्या, चर्चा सत्र आणि जगाला जगाची निर्मिती माईकवर ओरडून सांगितली असती. 


पण सगळं केलं असतं तरी त्याची निर्मिती विश्र्वनिर्मितीसाठी झाली नाही, मान्य करायला हवे. 

तिच्यासाठी काही करच अट्टाहास नाही पण तिच्या सन्मानाला स्वतःएवढा सन्मान दे... 

जर पाळी... 


जर तर आणि किंतू परंतु,

तरीही कल्पना करून पाहा,

सोप्पा नसतो हा जन्म,

जगत आहात तुम्ही

स्वतःच्या हक्कावर, 

तिला जगू द्या! 

Credit:-  Pooja Dheringe