नरनाला गविलगड अचलपूर Narnala Gawilgad Achalpur

तापी नदीच्या दक्षिणेला महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवर मेळघाट पसरलाय. ९०० ते १००० मीटर उंच सातपुडा डोंगररांग.  पश्चिमेला नरनाळा किल्ला तर पूर्वेला गाविलगड. नद्या, जंगल, कोकरू गोंड इत्यादी आदिवासींचा दुर्गम प्रदेश. वाघांचा अधिवास. मेळघाट व्याघ्र प्रकल्प पहिल्यांदा १९७४ मध्ये घोषित करण्यात आला. १६७७ वर्ग किलोमीटर इतकं सध्याचं अभयारण्याचं क्षेत्रफळ आहे. यामध्ये अकोट, सिपना आणि गुगमाळ हे वन्यविभाग येतात.  खांडू, खापरा, सिपना, गडगा आणि डोलार या इथल्या पाणलोट क्षेत्रातल्या मुख्य नद्या. या सगळ्याजणी तापीला मिळतात.  जंगलात सागवान मुख्य झाड. पट्टेरी वाघ, बिबट्या, सांबर, गवा, चितळ, हरीण, नीलगाय, डुक्कर, वानर, ससा, अजगर, साळींदर हे इथले मुख्य  वन्यजीवन.
जानेवारीचा पहिला आठवडा. नवीन वर्षाच्या सुट्यांचा मौसम. अशाच एका हॉलिडे स्पेशल रेल्वेने आम्ही अकोल्याला चाललोय.  शेगाव यायच्या आधी जलम्ब जंक्शन आहे तिथे ट्रेन अर्धातास थांबून राहिलीय. आधीच उशिराने धावत असलेल्या गाडीला अधिक उशीर. हॉलिडे स्पेशल गाड्यांचं हे असच चालायचं. भुसावळला कचोरी नाश्ता केलेला, इथे पुन्हा. विदर्भात शेगाव-कचोरी म्हणजे विशेष बरं का. म्हणजे कर्जतला दिवाडकरांचे वडापाव असतात तसे. ट्रेन ३ तास उशिराने पोहोचली. अकोला ते शहानुर ७० किलोमीटरचं अंतर आहे. अकोल्याचे आमचे मित्र गणेश वाकोडेंच्या गाडीने आम्ही शहानूरला पोहोचलो तो दुपारचे सव्वादोन वाजलेत. वेळेअभावी लंच स्किप. गाडीतच बसून केळी खाल्ली.

शहानूरला फॉरेस्ट ऑफिस आहे. इथून सफारीच्या वेळामध्ये नरनाळा किल्ला पाहण्यासाठी जाता येते. बोरी आणि नरनाळा या इथल्या मुख्य सफारी. फॉरेस्टच्या गेटवर एका फळ्यावर पर्यटकांनी कुठल्या दिवशी , कुठल्या सफारी दरम्यान कोणते प्राणी पहिले याची नोंद आहे. सफारीसाठी फॉरेस्ट परिसरात जिप्सी, कॅन्टॉर मिळतात. तुमची स्वतःची गाडी सुद्धा घेऊन जाता येते. सोबत फॉरेस्ट गाईड घेणे आवश्यक आहे. गणेश इथल्या परिसरात इंटरनेट सेवा पुरवतात. त्यामुळे त्यांचा इथे राबता आहे आणि लोकांशी ओळख.
प्रवेश फी , नोंदणी इत्यादी सोपस्कार करून आम्ही गाईडसोबत नरनाळा किल्ल्याकडे निघालोय. हल्ली किल्ला पायी पाहायला देत नाहीत. गेटपासून वाहन घेऊन जाणे जरुरी आहे. दुपारचे अडीज वाजून गेलेत. गेटपासून साडेसात किलोमीटरचा रस्ता चढून आल्यावर तुम्ही किल्ल्यात प्रवेश करता. शाहनूकडून गाडीवाटेने येताना सर्वात प्रथम मेहंदी दरवाजा लागतो.
इथून चालत थोडंसं पुढे गेल्यास सुंदर असा शहानुर दरवाजा आहे. शहानुर दरवाज्यावर उभं राहिला कि सभोवताली दूरवर छोट्या छोट्या वृक्षाच्छादित टेकड्या दिसतायत हिरव्यागार.
त्यानंतर आहे महाकाली दरवाजा. किल्ल्यावर सध्या अस्तित्वात असणाऱ्या अवशेषांपैकी अतिशय सुंदर काम असं याच वर्णन करावं लागेल. नरनाळा किल्ल्याचे जे बहुतेक फोटो नेटवर आहेत ते या दरवाजाचे. इथले सज्जा असणारे गवाक्ष अतिशय लोभसवाणे आहेत. मनुष्यप्राण्याच्या संचार कमी असल्याने सर्वत्र वटवाघळांचे साम्राज्य आहे.
१० व्या शतकात गोंड राजाने हा किल्ला उभारला. पुढे बराच काळ मुघलांच्या ताब्यात असताना यावरील नवीन बांधकाम करण्यात आले. साडेतीनशे एकरापेक्षा अधिक क्षेत्रफळ, ३००० फूट उंच, जाफ्राबाद आणि तेलीयागड असे उपदुर्ग असणारा हा किल्ला आहे. शक्कर तलाव हा किल्यावरील एक प्रमुख तलाव. इथे जवळच सुरक्षा चौकी आहे. इथला वायफाय राउटर आमच्या मित्राने लावलाय. चौकी पासून ४०० मीटर अंतरावर नवगझी तोफ आहे. महाकाली दरवाजाकडून चौकी कडे येताना आमच्या गाईडने आम्हाला खंडरात बसलेला घुबड दाखवला. चौकीच्या दर्शनी भागासमोर एक व्ह्यू पॉईंट आहे. इथून गडाची तटबंदी दिसते. खाली दरीत गवताळ कुरणं दिसतात. पूर्वी इथे वसलेल्या गावांचं पुनर्वसन अभयारण्याबाहेर करण्यात आलंय. समोरच्या बाजूला डोंगर धारेवर धारगड शिवमंदिर आहे. श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी फक्त इथे येण्याची परवानगी आहे.

पाचला आम्ही परत यायला निघालो. १५ मिनिटात खाली गेटवर. कँटीन मध्ये थोडा चहा नाश्ता. भूक लागलीय.


इथून निघालो तो काळोख पडू लागलाय. आम्ही चालतोय परतवाड्याला, ७० किलोमीटर अंतर आहे. इथे अजून एक वल्ली आम्हाला सामील होणार आहेत. वीरेंद्र वासनिक केबल आणि इंटरनेट व्यावसायिक. परतवाड्याला पोहोचोस्तोव काळोख पडला. इथे आल्यावर मलाई दूध प्यायलो.

वासनिक आम्हाला एका धाब्यावर घेऊन आले. इथे स्वतः स्वतःचे आणलेले चिकन शिजवता येते. ढाबा काही कारणाने बंद होता. पुन्हा परतवाड्याजवळ दुसरा ढाबा. चिकन ढाबेवाल्याला दिलं. अर्ध्या तासाने त्याने मस्त चिकन रस्सा बनवून दिलाय. जेवण झाल्यावर कार चिखलदरा चढू लागलीय. चिखलदऱ्याच्या थोडं आधी शंकरमुनि हॉटेलमध्ये आमचा आजचा दिवस संपलाय. हॉटेल प्रशस्त आहे. थंडी विशेष नाही.
सकाळी ७ वाजता सूर्योदय झाला तो हॉटेलच्या व्हरांड्यातून पहिला. साडेआठला सगळी मंडळी तयार होऊन निघाली. चिखलदरा बाजारात कांदापोहे आणि तर्री. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलोय त्यांचंच हे दुकान आहे. ९ वाजता आम्ही गाविलगड किल्ल्याच्या तिकीटघरापाशी आलो. सव्वानऊ वाजता किल्ल्याच्या मछली दारातून आम्ही प्रवेश केलाय.

इसवीसन १४२५ मध्ये अहमद शाह वालीने इथे बांधकाम केल्याचे उल्लेख आहेत. पण मूळ किल्ला १२ / १३ व्या शतकात गवळ्यांनी बांधला जो पुढे गोंडांनी काबीज केला. किल्ल्याची उंची ३६०० फूट आहे. साधारण क्षेत्रफळ आहे ३०० एकर आणि तटबंदी ७ किलोमीटर. चिखलदऱ्याच्या एका अंगाला, भीमकुंडाच्या नैऋत्येला छोट्याश्या दरीने वेगळं केलेलं हे पठार आहे.  मुख्य किल्ला त्यावर बसलाय. अधिक सुरक्षा म्हणून चिखलदऱ्याची किल्ल्याला जोडणारी बाजू बांधून सुरक्षित केलीय या बाजूला आपण बाहेरील किल्ला म्हणूया. इथे दुहेरी तटबंदी आहे शिवाय खंदक. १८०३ मध्ये इंग्रज मराठे युद्धात आर्थर वेलस्लीने इथेच बाहेरील किल्ल्याचा तट तोफेने खिंडार पडून किल्ल्यात प्रवेश केला होता.
मछली दरवाजातून पुढे आल्यावर बुरुजबंद दरवाजा आहे इथून आपला बाहेरील किल्ल्यावर प्रवेश होतो. इथे फार वेळ न घालवता खाली मुख्य किल्ल्याकडे मोर्चा वळवायचा. जरासा उतार आणि छोटीशी दरी ओलांडली कि आपण मुख्य किल्ल्याच्या शार्दूल आणि पुढे दिल्ली दरवाजाने किल्ल्यात प्रवेश करतो. शार्दूल दरवाजावर दोन हत्तींनी त्यांच्या पायात आणि तोंडात ५ सिंह पकडले आहेत. सिहांवर उभ्या गंडभेरूंडानी पुन्हा दोन सिंह पकडले आहेत. दोहांच्या मध्ये फळांनी लगडलेला एक कल्पवृक्ष आहे. दिल्ली दरवाजाने आत आलो कि खऱ्या अर्थाने आपण मुख्य किल्ल्यात प्रवेश करतो.
किल्ल्यात तलावांची मालिका  रचलीय. एका खोऱ्यात एकापाठी एक तलाव बांधलेत. एकाचा विसर्ग दुसऱ्या तलावाचा पाण्याचा स्रोत बनलाय. दिल्ली दरवाजापासून दुसऱ्या तलावाच्या एका अंगाला मशीद आणि दुसऱ्या अंगाला शिव मंदिर आहे. दोघांची पडझड  झालीय. मशीद परिसर पाहून आम्ही राणीच्या महालाकडे निघालोय. किल्ल्यावरील हि सर्वात सुंदर वस्तू आहे. या इमारतीला समोर ७ आणि पाठी ७ असे मिळून १४ घुमट आहेत. त्यातल्या काहींवर वटवाघळांनी कब्जा केलाय.
इथून किल्ल्याचा दक्षिण तट ढुंढाळून आम्ही परत निघालो. बरसाती तलाव, धोबी तलाव करून शिवमंदिराशेजारून भीमकुंड दरीच्या बाजूला एका उंच जागी तोफ  आहे. इजाजने भारताचा झेंडा काढून थोडे फोटो काढले आणि आम्ही निघालो. दिल्ली दरवाज्यातून बाहेर पडतो तो कित्त्येक ग्रुप किल्ला पाहायला येताना दिसताहेत. बऱ्यापैकी वर्दळ वाढलीय. बरं झाला आम्ही लवकर आलो ते. साडेअकरा वाजता आम्ही किल्याच्या बाहेर पार्किंग मध्ये आलो. तिथे उकडलेली बोरं खाल्ली. छान लागतात.
चखलदरा स्थलदर्शन चालू झालंय. देवी पॉईंट, मोझरी पॉईंट, एमटीडीसी जवळ एका काचेच्या स्कायवॉकच काम चालू आहे. ४०० मीटर रुंद दरीवर हा स्कायवॉक असेल. पंचबोल पॉईंट आणि भीमकुंड हे विशेष सुंदर पॉईंट्स. पंचबोलला दरीतून पाचवेळा प्रतिध्वनी येतो. पांडव अज्ञातवासात असताना विराट राजाच्या मेव्हण्याने किचकाने द्रौपदीला त्रास दिला भीमाने कीचकाचा वध केला. इथे भीमकुंडावर त्याने स्नान केल्याची कथा आहे. किचकदरा पुढे अपभ्रंश होऊन चिखलदरा अशी व्युत्पत्ती सांगितली जाते. विराट पॉईंट नावाचा एक पॉईंट सुद्धा चिलखदऱ्याला आहे.
स्थलदर्शन संपवून आम्ही जेवायला पुन्हा हॉटेलवर आलोय. वासनिक आणि गणेश एक वायफाय राउटर चालत नव्हता तो दुरुस्त करायच्या मागे लागलेत तोवर मी आणि इजाज हॉटेलजवळच्या परिसरात भटकतो. हॉटेलचा परिसर अतिशय सुंदर आहे. एक छोटासा तलाव. त्याचा पाण्यावर हिरवीगार शेती केलेली. एका घरात मातीची तुळस होती. तिथे गेलो तो कोकर पायाशी आली. त्यातल्या एकाला उचलून घेऊन गोंजारलं. जेवणं आटोपली आणि आम्ही चिखलदऱ्याचा निरोप घेतला. वाटेत एका ठिकाणी स्ट्राबेरी मळ्याला भेट.
 चिखलदरा घाट उतरू लागलोय परतवाड्याकडे. घाटात एकदोन ठिकाणी फोटो ब्रेक. खाली आल्यावर अचलपूरचा किल्ला पाहायचाय. अचलपूर परतवाडा अगदीच जवळ आहे. अचलपूरच्या किल्ल्याचे तटाचे आणि दरवाजाचे अवशेष बऱ्यापैकी आहेत ते पहिले आणि आमचा ठरलेला कार्यक्रम संपलाय. बडनेऱ्याहून परतीच रिझर्वेशन आहे. वसनिकांना इथे निरोप दिला. बडनेरला न जाता आम्ही अकोल्याला निघालो. बडनेरा अकोला एकटा दोन अडीज तास गणेश कंटाळला असता. ट्रेनच्या वेळेच्या अर्धातास आम्ही अकोल्याला पोहोचलो. चहा प्यायलो. गाडीच्या बाहेर उतरल्यावर गार वाटतंय. फ्लीस घालून घेतलं. गणेशना निरोप दिला. गणेश आणि त्यांचे मित्र वासनिक या दोघांमुळे आमची सफर अतिशय सोपी झाली.
गाडी उशिरा आली. कारमधून येताना रेल्वेच्या अँपवर खाणं ऑर्डर केलं होतं ते स्टेशनला घेतलं. पुन्हा हॉलिडे स्पेशल रिकामी  गाडी. सकाळी आरामात ठाण्याला पोचली. चिखलदऱ्याची आणि मेळघाटाची धावती भेट तर झाली. पुन्हा वाघाच्या मागावर यायला पाहिजे. सीमाडोह खुणावतंय.

- मधुकर धुरी