💥 कोरोनायोद्धयांचा अवमान


कोरोनाच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने टाळेबंदी लागू केली; परंतु त्याचा परिणाम थेट अर्थव्यवस्थेवर झाला. देशाचे आणि राज्यांचे उत्पादन कमी झाले. महसुली उत्पन्न कमी झाले. त्यामुळे राज्यांच्या पुढे आर्थिक समस्या निर्माण झाल्या. केंद्र सरकारनेही मदत केली नाही. त्याचा परिणाम असा झाला, की दिल्ली सरकारला कर्मचा-यांचे वेतन करता आले नाही. सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल झाली, तेव्हा न्यायालयाने काहीही करा; परंतु कोरोनायोद्धयांचा अवमान न करता त्यांना वेळच्या वेळी वेतन द्या, असा आदेश दिला. Contempt of the Corona  Warriors

महाराष्ट्रातही सुरुवातीला वैद्यकीय कर्मचा-यांच्या वेतनात कपात करण्यात आली होती; परंतु त्याविरोधात आवाज उठल्याने त्यांचे वेतन देण्यात आले. राज्य सरकारची परिस्थितीच इतकी वाईट आहे, की सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता आता देणे शक्य नसल्याने ते देणे राज्य  सरकाने एक वर्ष लांबणीवर टाकावे लागले. एसटी कर्मचा-यांना निम्मेच वेतन देता येत आहे. त्यांचीही नाराजी कायम आहे. त्यातच आता कोरोना संसर्गामध्ये काम करणाऱ्या पालिकेतील डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रतिदिवस तीनशे रुपयांचा भत्ता देण्यात येणार होता.

मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे मिळाले; मात्र त्यानंतर रुग्णालयातील अनेकांना हे पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारी वाढत्या आहेत. हे पैसे तसेच जेवणासाठी देण्यात आलेल्या कुपन्सचाही लाभ मिळालेला नाही, असे पालिका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. मार्च महिन्यानंतर हे पैसे पगारामध्ये देण्यात येतील, असे सांगण्यात आले होते; मात्र ते देण्यात आले नाहीत. कोरोना प्रादुर्भावाच्या काळामध्ये दिवसरात्र एक करून काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ही रक्कम पालिकेने घोषित केली होती. ती स्वतःहून पुन्हा-पुन्हा का मागायची, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचा डोलाराही कोसळला आहे. त्यामुळे ही वेळ आली आहे.

केईएम, लोकमान्य टिळक, नायर रुग्णालयामधील कर्मचारी इतर वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आले आहेत. मनुष्यबळाच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी ही तजवीज करण्यात आली आहे. त्यामुळे जे कर्मचारी इतर रुग्णालयांमध्ये काम करतात, त्यांचे जेवणाचे कुपन्स तसेच ही भत्त्याची रक्कम ते ज्या रुग्णालयामध्ये नियुक्त करण्यात आले आहे, तिथे मिळेल असेही सांगण्यात येते. प्रत्यक्षात त्या ठिकाणीही कुपन्स वा रक्कम जमा झालेली नाही. चौकशी केल्यानंतर जेवणासाठी आलेले कुपन्स संपले असे सांगण्यात आले. एकतर टाळेबंदीमुळे हाॅटेल्स, खानावळी बंद असल्याने जेवणाची सोय होत नाही आणि त्यातच कुपन्स दिली जात नसल्याने वैद्यकीय कर्मचा-यांची गैरसोय होत आहे.

दोन दिवसांपूर्वी लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये ज्या कामगारांना जेवणाचे डबे हवे आहेत, त्यांनी नावे, नोंदणी क्रमांक द्यावा असे सांगण्यात आले; मात्र जे जेवणाचे डबे घेतील, त्यांना रोजचा तीनशे रुपये भत्ता मिळणार नाही असेही सांगण्यात आले. ज्यावेळी करोनासाठी भत्ता संमत झाला होता, त्या वेळी त्यात जेवणाच्या ऐवजी पैसे असे ठरले नसल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिले आहे. कायम स्वरूपाच्या वैद्यकीय सेवेत असणाऱ्यांना तसेच कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचा नियम लागू केला जातो.

कूपर रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सांगितले, की कोरोनाच्या संसर्गाच्या काळामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निश्चित स्वरूपामध्ये भत्ता देण्यात येणार होता; मात्र या संदर्भात प्रत्येक रुग्णालयातून मिळणारी उत्तरे वेगवेगळी आहेत. काही ठिकाणी महिन्याला एक ठराविक रक्कम देण्यात आली. ही रक्कम प्रती दिवस मिळणाऱ्या रकमेइतकी नव्हती. यासंदर्भात पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी वेतनामधून ही रक्कम देण्यात येईल असे सांगितले.