राज्याला मोठा दिलासा! एकाच दिवसात १२०० रुग्ण करोनामुक्त राज्याला मोठा दिलासा!




मुंबई बातम्या : Mumbai News राज्यात आज करोनाचे १२०२ रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकाच दिवसांत बरे झालेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या असून, राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सुमारे २५ टक्के आहे. करोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर नेण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री यांनी दिली. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात नॉन रेड झोनमध्ये (Red zone)  बऱ्यापैकी शिथिलता देण्यात आली असून, खासगी डॉक्टर (Doctor) आणि सरकार यांच्यात समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. आरोग्यमंत्री टोपे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून आज राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. 'पावसाळा तोंडावर आला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाशिवाय अन्य आजारांच्या उपचारासाठी खासगी डॉक्टरांनी त्यांचे रुग्णालय सुरू ठेवणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी आज मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यात नॉन रेड झोनमध्ये बाजारपेठा, दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी आपापली रुग्णालये सुरू करावीत. यासाठी सरकार (government)  आणि त्यांच्यात समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरावर तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समन्वय समिती नेमण्यात आली आहे,' अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.